The Battle of Budgam, First Kashmir War, article 5

समरांगण कथासागर : लेखांक 5

विवेक मराठी    10-Apr-2025
Total Views |
@मल्हार कृष्ण गोखले

Budgam
 
 
गेल्या चार लेखांकात आपण काश्मीर खोर्‍यामधली लष्करी, राजकीय, सामाजिक स्थिती पाहिली. जम्मू-काश्मीर संस्थानाचे तीन भाग होते. सपाटीवरचा भाग म्हणजे जम्मू. या प्रदेशात हिंदू बहुसंख्य होते. या पुढचा पहाडावरचा प्रदेश म्हणजे काश्मीर. हा मुख्यत: झेलम नदीच्या खोर्‍यात येतो. म्हणून याला काश्मीर खोरे असे म्हणतात. तिसरा भाग म्हणजे अति उंचावरचा बर्फाळ पहाडी लहान प्रदेश. अतिशीत हवामानामुळे लद्दाख (लडाख हा चुकीचा उच्चार) प्रदेशात लोकवस्ती फारच विरळ आहे आणि जी आहे ती बौद्धधर्मीय आहे. लद्दाख प्रदेशातच जम्मू-काश्मीर संस्थानच्या सीमा म्हणजेच एक प्रकारे भारताच्या सीमा चीन-अफगाणिस्तान-रशिया यांना भिडलेल्या आहेत. म्हणजेच आंतरराष्ट्रीय लष्करी सामरिक नीतीच्या दृष्टीने लद्दाखला अतोनात महत्त्व होते, आहे. आणि म्हणूनच पाकिस्तानला किंवा त्याच्या सैन्याचे सूत्रसंचालन करणार्‍या इंग्रज सेनापतींना लद्दाखही भारताकडून हिसकावून घ्यायचाच होता. मग काय घडले पुढे?
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. त्या अगोदर एक दिवस म्हणजे 14 ऑगस्ट या दिवशी पाकिस्तान हा नवीन देश जन्माला आला. पण त्याही अगोदर एक दिवस म्हणजे 13 ऑगस्ट रोजीच रावळपिंडीच्या पाकिस्तानी सेना मुख्यालयात विचार सुरू झाला होता की, जर काश्मीर नरेश महाराजा हरिसिंह यांनी त्यांचे संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याचे नाकारले. तर काय करायचे? आणि निर्णय झाला होता की, काश्मीरवर हल्ला चढवून ते काबीज करायचे. हरिसिंहांनी कोणताच निर्णय न घेतल्यामुळे जीनांनी आपला निर्णय पक्का केला. पाकिस्तानी सैन्यातल्या मेजर जनरल अकबरखान या अतिशय कुशल, धडाडीच्या सेनापतीवर काश्मीर काबीज करण्याची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली.
 
 
आणि पाकिस्तानच्या जन्मानंतर ठीक सव्वा दोन महिन्यांनी म्हणजे 22 ऑक्टोबर 1947 या दिवशी पाक सैन्याने पाणी टोळीवाल्यांच्या वेषात काश्मीरमधील डोमेल या ठाण्यावर हल्ला केला. पाकने या कारवाईला सांकेतिक लष्करी नाव दिले होते ’ऑपरेशन गुलमर्ग’.
 
जम्मू-काश्मीरच्या संस्थानी सैन्यातील आपल्या विश्वासू मुसलमान सैनिकांनी आपल्या हिंदू सेनापतीला ठार केले आहे नि ते उघडपणे टोळीवाल्यांना सामील झालेत, हे कळल्यावर हरिसिंहांनी 26 ऑक्टोबरला भारतात विलीन होण्याच्या करारावर सही केली. आता जम्मू-काश्मीर हे संस्थान अधिकृतपणे भारताचा भाग बनले.
 
 
आपल्या महाराष्ट्राचे जसे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ इत्यादी विभाग आहेत तसेच जम्मू-काश्मीर या संस्थानाचे चार विभाग होते - काश्मीर हा डोंगराळ विभाग, जम्मू हा त्याच्या पायथ्याचा सखल विभाग, लद्दाख हा पूर्वेकडचा डोंगराळ, बर्फाळ विभाग आणि गिलगिट-बाल्टिस्तान हा उत्तरेकडचा अतिविरळ लोकसंख्येचा विभाग- या विभागात भारत, चीन आणि तत्कालिन सोवियत रशिया यांच्या सरहदी एकमेकांना भिडतात. त्यामुळे लष्करीदृष्ट्या हा विभाग अति अति महत्त्वाचा होता.
 

Budgam 
 
गिलगिटमध्ये इंग्रजांनी ’गिलगिट स्काऊट’ नावाचे एक दल उभेे केले होते. तिच्यात मुसलमान आणि हिंदू निम्मे-निम्मे होते. मेजर ब्राऊन हा इंग्रज सेनाधिकारी गिलगिट स्काऊटचा कमांडर होता. 26 ऑक्टोबरला हरिसिंहांनी सामीलनाम्यावर सही केल्याचे कळल्यावर 29 ऑक्टोबरला मेजर ब्राऊनने चक्क बंड केले. गिलगिट स्काऊटच्या मुसलमान सैनिकांनी आपल्या हिंदू सहकार्‍यांना सरळ ठार मारले. गिलगिटच्या हरिसिंहांच्या प्रमुखाला म्हणने ब्रिगेडिअर धनधारसिंह यांना कैद करून बडतर्फ करण्यात आले. गिलगिटच्या सरकारी कचेरीवर मेजर ब्राऊनने पाकिस्तानी झेंडा फडकवला.
 
 
इकडे 27 ऑक्टोबरच्या पहाटे भारतीय सैन्याची पहिली तुकडी श्रीनगर विमानतळावर उतरली आणि काश्मीर व जम्मू विभागांमध्ये लढायांमागून लढाया झडू लागल्या. पठाण टोळीवाले जबर मार खात मागे हटू लागले. आता जीनांनी पठाणी टोळीवाले हा फसवा बुरखा टाकून दिला आणि जानेवारी 1948 ला पाकिस्तानी सैन्य अधिकृतपणे युद्धात उतरले. याच सुमारास भारतीय सैन्याने काश्मीरमध्ये ’19 इन्फन्ट्री डिव्हिजन’ हे एक नवे दळ उभारले आणि त्याचे प्रमुखत्व मेजर जनरल कोदंडेरा सुब्बय्या थिमय्या म्हणजेच के. एस. थिमय्या यांच्याकडे सोपवण्यात आले.
 
 
सैन्याची सगळ्यात छोटी तुकडी म्हणजे सेक्शन. एका सेक्शनमध्ये 10 सैनिक असतात. तीन सेक्शन्सची एक प्लॅटून बनते. तीन प्लॅटून्सची एक कंपनी बनते, चार कंपन्यांची एक बटालियन बनते. तीन बटालियन्सची एक ब्रिगेड बनते आणि चार ब्रिगेडसची एक डिव्हिजन बनते. हे सगळे ढोबळ हिशोबाने आहे. सैन्याच्या त्या-त्या ठिकाणच्या आवश्यकतेनुसार यात कमी-जास्त होऊ शकते.
काश्मीर आणि जम्मू या दोन्ही विभागात भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला पक्के रोखून धरलेले होते. ऑक्टोबर 1947 अखेर मेजर ब्राऊनने दगाबाजीने गिलगिट जिंकल्यावर पठाणी टोळीवाले तेथून पुढे सरकले. त्यांचे उद्दिष्ट होते - लद्दाख विभागाची राजधानी लेह! गिलगिट ते लेह हे अंतर जवळपास 500 कि.मी. आहे. पण या वैराण प्रदेशात पाक सैन्याला रोखायला होेतच कोण? फक्त स्कार्दू नावाचा एकमेव किल्ला. फेब्रुवारी 1948 मध्ये टोळीवाले आणि पाक सैन्य स्कार्दूला पोचले. महाराष्ट्राच्या इतिहासात किल्ले चाकणचा रोमांचकारी वेढा आहे. किल्ले पन्हाळगडाला आदिलशाही सिद्दी जौहरचा वेढा पडलाय. खुद्द शिवराय या वेढ्यात अडकून पडलेत आणि इकडे चाकणच्या किल्ल्याला मुघल पातशहा औरंगजेब याचा खुद्द मामा, रणधुरंधर सेनापती शाहिस्तेखान याचा वेढा पडलाय. चाकणचा किल्ला म्हणजे अवघड, बुलंद डोंगरी किल्ला नव्हे; भुईकोट गढीच ती. पण किल्लेदार फिरंगोजी नरसाळा असा जबर हिंमतीचा की, मोगलांच्या अफाट सेनासंभारासमोर त्याने तब्बल दोन महिने चाकण लढवला. इथे स्कार्दूमध्येही फिरंगोजी नरसाळ्याच्याच जातीचा एक जबर मर्द पाय रोवून उभा राहिला. त्याचे नाव कर्नल शेरजंग थापा. अपुरे सैन्य, अपुरी शस्त्रे, अपुरे अन्नधान्य आणि जम्मू-काश्मीर अथवा लद्दाख या विभागांकडून कसलीही मदत मिळण्याची शक्यता शून्य, अशा परिस्थितीत या बहाद्दराने आणि ’जम्मू-काश्मीर रायफ़ल्स’ या याच्या पलटणीने तब्बल सहा महिने- फेब्रुवारी ते ऑगस्ट 1948 - शत्रूला रोखून धरले होते. स्कार्दूमधला एकूण एक सैनिक ठार झाल्यावरच पाक सैन्य पुढे सरकू शकले. लेह जिंकण्याच्या पाकच्या या मोहिमेचे नाव होते ’ऑपरेशन स्लेज.’
 
 
एकदा ते पुढे सरकल्यावर यांनी द्रास आणि कारगिलवर सहज कब्जा केला. आता लद्दाखची राजधानी लेह त्यांच्या सहज आवाक्यात आली पण भारतीय सेनापतींना याची कल्पना होतीच. डोग्रा रेजिमेंटमधले 40 जवान कॅप्टन पृथ्वीचंद आणि कॅप्टन खुशालचंद या दोन भावांच्या अधिपत्याखाली झोजिला खिंडीतून चालत लेहला पोचले. हे नुसते वेडे धाडस नव्हते, तर हा चक्क मूर्खपणा होता. पण भारतीय सेनापतींनी लेहमधल्या नागरिकांसाठी तो केला.. त्याला यश आले. डोग्रा रेजिमेंटने लेहच्या आसमंतात पक्के मोर्चे उभारले, पण हे पुरेसे नव्हते. लेहला विमानाने रसद पुरवणे अत्यावश्यक होते, तेव्हा आणखी एक बहादुर पुढे आला. त्याचे नाव एअर कमोडोर मेहेरसिंग, लेहला धावपट्टी नव्हतीच. फक्त सपाट मोकळी जागा होती. विमानासाठी आवश्यक अशा दिशादर्शक यंत्रणेचा अर्थातच मागमूसही नव्हता. अशा ठिकाणी कमोडोर मेहेरसिंग विमान घेऊन निघाले म्हटल्यावर खुद्द डिव्हिजन कमांडर मेजर जनरल थिमय्या पुढे सरसावले आणि या दोघांनी लेहला विमान उतरवले. भारतीय सेना आणि तिचे सेनापती हे असे आहेत!
 
 
लेहवरचे संकट टळले आणि आता द्रास-कारगिलमधून शत्रूला पिटाळून लावण्याचा विचार सुरू झाला. या भागात डोंगराळ कडे, कपारी, गुहांमधून शत्रूने पक्के मोर्चे बांधले होते. तोफांचे गोळे वक्राकार (पॅराबोला) गतीने जातात. त्यामुळे ते खबदाडीत दडलेल्या शत्रूपर्यंत पोचेनात. ब्रिगेडियर भरत यांच्या हाताखालच्या मराठा, गुरखा, राजपूत आणि पतियाळा या पलटणींनी पराक्रमाची शर्थ केली. पण एकापरीने ती व्यर्थ ठरली.
 
 
मग जनरल थिमय्यांनी एक लोकविलक्षण साहस केले. जम्मूहून त्यांनी ’7 कॅव्हलरी रेजिमेंट’ ही रणगाडा पलटण मागवली. या पलटणीचे प्रमुख कर्नल राजिंदरसिंग स्पॅरॉ हा आणखी एक वेडा माणूस. मद्रास सॅपर्स या लष्करी इंजिनिअरदळाच्या मेजर थांगराजू यांच्या सहाय्याने त्यांनी थेट झोजिला खिंडीपर्यंत रस्ता बांधला. कसा रस्ता? हिमालयाच्या कच्च्या मातीत 11 हजार फूट उंचीवरच्या बर्फाळ झोजिला खिंडीत रणगाड्यांची अवजड धुडं पेलून नेणारा पक्का रस्ता.
 
 
1 नोव्हेंबर 1948 ला रणगाड्यांचे गोळे सरळ रेषेत (वक्राकार नव्हे). शत्रूच्या मोर्चांवर आदळू लागले आणि एक वर्षभर रेंगाळत चाललेल्या युद्धाचे सगळे पारडेच फिरले. शत्रूला माघार घेण्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. 1 जानेवारी 1949 ला युद्धबंदी झाली. या बातम्यांनी संपूर्ण पाश्चिमात्य जग, तिथले जाणते सेनापती, युद्धतज्ज्ञ, युद्धवार्ताहर अक्षरश: हादरले. 19 हजार फूट उंचीवर रणगाडे नेले? कुणी? काल स्वतंत्र झालेल्या भारताने? आणि कोण हा वेडा सेनापती? त्याचं नाव मेजर जनरल थिमय्या, म्हणे! हद्द झाली बुवा! पण असे वेडे निर्माण होतात, तेव्हाच इतिहास घडतो.