द्रष्टा राज्यकर्ता सरफोजी राजा द्वितीय

विवेक मराठी    25-Sep-2024
Total Views |
@डॉ. विद्या गाडगीळ  9323869389
सरफोजी राजांचे विचार अतिशय उदार आणि उदात्त होते. त्यांनी अनेक अज्ञानी व धर्मभोळ्या समजुती बाजूस सारून राज्यात अनेक सामाजिक व शैक्षणिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. काळाची पावले ओळखून आधुनिकतेची कास धरली. अशा या द्रष्ट्या राजाच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण चिरकाल लोकांच्या मनात टिकून राहाते. सरफोजी राजांचा जन्म 24 सप्टेंबर 1777 रोजी झाला होता. यानिमित्ताने त्यांचे स्मरण करणारा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची व साम्राजाची माहिती करून देणारा लेख...
 
Tanjawar 
तंजावर - एक यक्षनगरी. महाराष्ट्रातील मराठ्यांच्या शौर्यशाली इतिहासाला गौरवशाली, प्रतिभाशाली इतिहासाची जोड कावेरीच्या खोर्‍यात वसलेल्या या यक्षनगरीने दिली. ज्या वेळेस महाराष्ट्रात घोड्यांच्या टापांचे आवाज, तलवारीचे खणखणाट होत होते, तेव्हा तंजावरी नृत्याचे पदझंकार उमटत होते, संगीताच्या मैफली झडत होत्या आणि मराठी वाङ्मयाच्या सर्व शाखा विकसित होत होत्या. मराठी संस्कृती निश्चित असा आकार घेत होती. महाराष्ट्रापासून कोसो दूर तंजावरमध्ये गेली कित्येक शतके मराठी संस्कृती आकार घेत राहिली. ही निःसंशय विस्मयचकित करणारी बाब. याचे सारे श्रेय तंजावरच्या मराठ्यांकडे जाते. यात तंजावरचे राजे सरफोजी दुसरे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. तंजावर म्हणताच आपणास आठवतात ते व्यंकोजी राजे, सरफोजी राजे दुसरे, सरस्वती महाल ग्रंथालय, मराठी नाटक, भरतनाट्यम, बृहदीश्वर मंदिरातील पेरिय कोविल (मोठे देऊळ) याच्या प्रांगणातील भिंतीवरील मराठी रियासत आणि आणखी बरेच काही. शिवाजीराजांचे सावत्रबंधू व्यंकोजी राजे यांनी कावेरीच्या खोर्‍यात तंजावरी मराठी राज्य स्थापन केले (1676).
 
 
या राज्याचा पुढे फारसा विस्तार झाला नाही; परंतु इसवीसन 1856 पर्यंत- म्हणजे सुमारे 180 वर्षे तंजावरचे राज्य अस्तित्व राखून होते. तंजावरमध्ये मराठी संस्कृतीचा प्रवाह वाहता ठेवण्याचे श्रेय तंजावरच्या या राज्यकर्त्यांना जाते.
 
 
पुस्तक खरेदी करा....
तंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान
लेखक – मिलिंद पराडकर
‘तंजावरचे मराठे ः दक्षिणेच्या इतिहासातील योगदान’ हे ‘सा. विवेक’ प्रकाशित आणि इतिहासाभ्यासक डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर लिखित पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. शहाजीराजे यांच्या दूरद़ृष्टीतून महाराष्ट्र व तंजावर येथील राज्यांचा निर्मितिहास, त्याचप्रमाणे व्यंकोजीराजे व त्यांचे वंशज यांनी केलेल्या कामाचा आढावा, तंजावरकर मराठ्यांनी महाराष्ट्रातील मराठ्यांच्या पराक्रमाला कलेची व साहित्याची जोड कशी दिली याचा आढावा घेणारे हे पुस्तक आहे.
https://www.vivekprakashan.in/books/the-marathas-of-thanjavur/
 
 
तंजावरच्या मराठ्यांचा दरबार विद्वान आणि कलावंतांनी गजबजलेला होता. तंजावरचे राज्यकर्ते स्वतः विद्वान व कलासक्त होते. परिणामी तिथे मराठी वाङ्मय, नाटक, नृत्य, कला, संगीत आदींची विस्मयकारक प्रगती झाली. याचे सारे श्रेय तंजावरच्या मराठ्यांकडे जाते. यात तंजावरचे राजे सरफोजी दुसरे यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. तंजावरला पूर्वेचे व्हेनिस किंवा दक्षिणेचे एडन म्हणतात. कावेरीचे सुपीक खोरे, आल्हाददायक हवा, उंच नारळाची झाडे असलेले तंजावर हे संस्थान फारच लहान होते. भारताच्या नकाशात तर ते टिपूस भासते. तंजावर संस्थानाला प्राचीन काळापासून उच्च अभिरुचीचा वारसा लाभला होता. तंजावरच्या मराठ्यांनी पूर्वसुरींपासून चालत आलेल्या या वारशाला मराठी संस्कृती व कलेची जोड दिली.
 

Tanjawar 
 
सरफोजी राजांचे व्यक्तित्व
 
इसवी सन 1798 मध्ये सरफोजी राजांचे राज्यारोहण झाले; परंतु राज्याची सर्व सूत्रे इंग्रजांकडे होती. सरफोजी राजांची एकूण कारकीर्द 34 वर्षांची! या राजाने कला, संगीत, नृत्य, शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणारे, त्यांनीच नावारूपाला आणलेले सरस्वती महाल ग्रंथालय आजही दिमाखात उभे आहे. पर्यटकांचे नव्हे, तर पौर्वात्य व पाश्चात्त्य अभ्यासकांचे केंद्र असलेले हे सरस्वती महाल ग्रंथालय, मराठ्यांचा इतिहास सांगणारा बृहदीश्वराच्या मंदिरातील कोरीव लेख त्यांचे खरेखुरे स्मारक होय.
 
 
सरफोजी राजांचा जन्म 24 सप्टेंबर 1777 रोजी झाला. तंजावरचे राजे तुळजेंद्र राजे दुसरे यांना अपत्य नसल्याने 23 जानेवारी 1787 रोजी त्यांनी सरफोजी राजांना दत्तक घेतले. तुळजेंद्र राजांचे बंधू अमरसिंह यांनी सत्तेच्या राजकारणात सरफोजी राजांना राजगादीपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले; परंतु डच मिशनरी शॉर्झ यांच्या प्रयत्नांनी त्यांचे चेन्नई येथील मिशनरी शाळेत शिक्षण झाले. तसेच त्यांना संस्कृत व मराठी शिकवण्यासाठी त्या त्या भाषेच्या पंडितांची नेमणूक करण्यात आली होती. राजांची एकंदर कारकीर्द शांततेत गेली. त्यामुळेच त्यांनी आपली कारकीर्द शारदादेवीच्या सेवेत रुजू केली.
 
 
उंचेपुरे, गोरे, झुबकेदार मिशा असलेल्या सरफोजी राजांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संपन्न होते. गुरू शॉर्झ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उत्तम संस्कार झाले. सरफोजी राजे ज्ञानी, ज्ञानप्रेमी, उदार, सुसंस्कृत व सर्वगुणसंपन्न होते. विद्याप्रसार, ग्रंथसंग्रह व विद्वानांची संगत यातच त्यांनी आपली सर्व हयात व्यतीत केली. चित्रकला, बागकाम, नाणेसंग्रह, ग्रंथसंग्रह, रथांच्या शर्यती, शिकार, बैलांच्या झुंजी या सगळ्यांची त्यांना आवड होती. तसेच संगीत, नृत्य, नाट्य व विज्ञान यात त्यांना विशेष रुची होती. सरफोजी राजे खर्‍या अर्थाने भाषापंडित होते. मातृभाषेव्यतिरिक्त त्यांना संस्कृत, तमिळ, तेलुगू, इंग्रजी, जर्मन, इटालियन, फ्रेंच, लॅटिन, अरेबिक इत्यादी भाषा अवगत होत्या. राजे अतिशय कल्पक बुद्धिमत्तेचे व नावीन्याचे चाहते होते. पौर्वात्य व पाश्चिमात्य संस्कृतीतील अनेक चांगल्या गोष्टींचा मेळ घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या उदार, व्यासंगी व कलासक्त राजाने विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करून आपल्या कार्याचा कायमस्वरूपी ठसा तंजावरच्या इतिहासावर उमटविला. वाङ्मय, नृत्य व संगीत यांची अजोड सेवा राजांनी केली.

 
वाङ्मय
 
तमिळ, मराठी, तेलुगू भाषेतून विपुल वाङ्मयीन रचना सरफोजी राजांनी स्वतः केल्या आणि दरबारी पंडितांकडूनही करून घेतल्या. गोविंद कवी, विरुपाक्ष कवी, गंगाधर कवी, अंबाजी पंडित, अवधूत कवी हे त्यांचे दरबारी होते. सरफोजींच्या आश्रयामुळे व आज्ञेमुळे आपण ग्रंथरचना करू शकलो, अशी कृतज्ञता गोविंद कवी व विरुपाक्ष कवी यांनी आपल्या ग्रंथांतून प्रकट केली आहे. ’शरभेंद्रने (सरफोजी) सुरू केलेल्या शाळेत शिकून आपण ही काव्यरचना केली,’ अशी विनम्र कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलेली आढळते.
 
 
vivek
 
सरफोजी राजांनी पुराणकथा रचल्या. या रचना पद, श्लोक, ओव्या, आर्या, दिंडी, सवाई, छंद, लावणी, दोहा, गोपी गीत इत्यादी प्रबंधांत केल्या आहेत. या रचना नृत्य, नाट्य व संगीतमय आहेत. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा मराठ्यांचा इतिहास सांगणारा आशिया खंडातील सर्वात मोठा मराठी भाषेतील कोरीव लेख बृहदीश्वराच्या मंदिरात कोरून मराठ्यांचा इतिहास त्यांनी अजरामर केला. वाङ्मयाबरोबरच नाट्यकलेचीही सेवा सरफोजी राजांनी केली.
 
नाट्यकला
 
’गंगा विश्वेश्वर परिणय’, ’मोहिनी-महेश परिणय’, ‘देवेंद्र कोरवंझी’, ’सुभद्रा कल्याण’ आदी अनेक नाटके राजांच्या नावावर आहेत. ’सुभद्रा कल्याण’ हे नाटक ताडपत्रावर तेलुगू लिपीत लिहिलेले आहे. ही नाटके त्या काळी सादरही केली जात. ती पाहण्यास विद्वान व रसिक येत असत. ही नाटके तीन अंकी, चार अंकी वा पाच अंकी आहेत. त्या काळी नाट्यतंत्रही चांगलेच विकसित झाले होते. या नाटकांतून स्थळ व काळाच्या सूचना दिलेल्या दिसतात. तसेच दोन अंकांतील घटना नाट्यअंतर्गत नाटक दाखवून सादर केलेल्या आहेत. या नाटकातून नृत्य व गीते आहेतच; परंतु पद्यापेक्षा गद्याचा भाग अधिक असल्याने ही नाटकं वास्तवदर्शी वाटतात. ’देवेंद्र कोरवंझी’ हे वैशिष्ट्यपूर्ण नाटक जगाचा भूगोल सांगण्यासाठी लिहिले गेले आहे. या नाटकात सूर्यमालेची माहिती, दिवस-रात्र कशी होते, पृथ्वीवरील पाचही खंडांची माहिती, पृथ्वीची गती इत्यादी गोष्टी आहेत. नाट्याबरोबरच संगीत व नृत्याची जाणही राजांना उत्तम होती.
 
संगीत व नृत्य
 
 
सरफोजी राजांचा काळ हा संगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. त्यांच्या दरबारात 360 संगीततज्ज्ञ होते. कर्नाटक संगीताला विकसित कलेचा दर्जा प्राप्त करून देणारे प्रसिद्ध संगीतकार त्यागराज, श्याम शास्त्री व मुथुस्वामी दीक्षितार हे तिघेही सरफोजींचे दरबारी गायक होते. आजही 6 जानेवारीला त्यागराजाच्या स्मरणार्थ तिरुवारुर येथे संगीत मैफल नियोजित केली जाते. त्यांच्या दरबारात पाश्चिमात्य संगीतकारही होते. तंजोर बँडची स्थापना त्यांनी केली. इंग्लिश वाद्यवृंदासाठी हिंदुस्थानी राग व बंदिशी त्यांनी इंग्लिश नोटेशन पद्धतीत बसवली. यावरून त्यांचे कल्पनाचातुर्य दिसते. हेच कल्पनाचातुर्य त्यांच्या नृत्यरचनामध्येही आढळते. 18 रचनांचे गुच्छ (निरूपण) करून त्या 18 रागांमधून एकच कथासूत्र त्यांनी गुंफलेले दिसते.
 


Tanjawar 
 
शिक्षण
 
नृत्य, नाट्य, संगीत यांचा विकास होत असताना शिक्षण व ग्रंथालयांकडेही त्यांनी विशेष लक्ष पुरवले. देशी भाषेबरोबरच इंग्रजी भाषेतून शिक्षण देणार्‍या शाळा सरफोजी राजांनी सुरू केल्या. तंजावरपासून 20 किलोमीटर अंतरावर मायावरम येथे त्यांनी इंग्रजी शाळा सुरू केली. ख्रिश्चन शाळांना छत्रमचाच भाग समजून आर्थिक साहाय्य दिले जात असे. चर्चच्या शेजारी शिक्षकांच्या राहण्याची सोय होती. त्या त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती शिक्षक म्हणून नियुक्त केल्या जात. स्त्री शिक्षक नेमून मुलींसाठी शाळा सुरू करून त्यांनी समाजक्रांतीच्या दिशेने फार मोठे पाऊल उचलले. भूगोल व इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांचे मराठी व तमिळ भाषेत भाषांतर केले. विज्ञान, वेदशास्त्र, खगोलशास्त्र, संगीत, शिल्पकला अशा विविध विषयांचे अध्यापन त्यात केले जात असे. लोकांना हसतखेळत भूगोलाचे ज्ञान देण्यासाठी ‘देवेंद्र कोरवंझी’ हे वैशिष्ट्यपूर्ण नाटक त्यांनी लिहिल्याचे आधी सांगितलेच आहे.
 
 
सरस्वती महाल ग्रंथालय
 
 
शिक्षणासाठी ग्रंथालयांची आवश्यकता ओळखून आणि सरफोजी राजांच्या ग्रंथवाचन आणि ग्रंथसंग्रह यांच्या असलेल्या आवडीतून तंजावरचे प्रसिद्ध सरस्वती महाल ग्रंथालय आकाराला आले. मराठी व मोडीतील असंख्य हस्तलिखितांचा संग्रह; तेलुगू, तमिळ, संस्कृत व इंग्रजी भाषेतील ग्रंथ, ताडपत्रांवरचे संग्रह हे या ग्रंथालयाचे खास वैशिष्ट्य आहे. सरफोजी राजांना यात्रेची खूप आवड होती. त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी देताना त्या त्या ठिकाणच्या विद्याकेंद्रांनाही भेटी देऊन तेथून ग्रंथ खरेदी करून आणले. इतकेच नव्हे तर त्या ग्रंथांचे प्रतलेखन करण्यासाठी त्या त्या भाषेतील पंडितांची नियुक्ती केली. नवविद्याकलानिधी या छापखान्याची सुरुवात या ग्रंथालयात केली. एकदा तर त्यांनी दूरच्या प्रदेशातून आलेल्या गृहस्थाकडून हस्तलिखित विकत घेण्यासाठी आवश्यक निधीच्या अभावामुळे आपल्या गळ्यातील रत्नहारच त्याला देऊन ती हस्तलिखिते ताब्यात घेतली. स्वाभाविकपणेच या ग्रंथालयास ‘राजा सरफोजी सरस्वती महाल ग्रंथालय’ हे नाव अत्यंत सार्थ ठरले आहे. इतिहास, संगीत, वैद्यकशास्त्र, वाङ्मय अशा विविध विषयांतील संशोधकांसाठी हे अक्षरसाम्राज्य अक्षय टिकणारे आहे.
 
वैद्यकशास्त्र
 
सरफोजी राजांना वैद्यकशास्त्राचीही आवड होती. त्यांनी वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासाठी व संशोधनासाठी ’धन्वंतरी महाल’ची स्थापना केली. मानवी रुग्ण व प्राणी या दोघांच्या औषधोपचाराची सोय व संशोधन या महालात चालत असे. आधुनिक वैद्यकशास्त्र, युनानी, आयुर्वेद या तिन्ही शाखांचे संशोधन तेथे होत असे. विविध औषधे व जडीबुटी यांचे उपयोग सांगणारे 18 खंड सरस्वती महाल ग्रंथालयात उपलब्ध आहेत. रुग्णांवर केलेल्या उपचारांच्या संबंधीची कागदपत्रे (केस पेपर) या ग्रंथालयात जतन करून ठेवलेली आहेत. धन्वंतरी महालात रुग्णाला सांगितलेल्या उपचारांसंबंधीची एक कविता उपलब्ध आहे. त्या कवितेला ’शरभेंद्र वैद्य मुरईगल’ असे म्हणतात. यात विविध आजारांवर केल्या जाणार्‍या उपाययोजनांची तपशीलवार माहिती आहे.
 
 
Tanjawar
 
सरफोजी राजांना नेत्रचिकित्सेत रस होता. ते स्वतः नेत्रचिकित्सा करून डोळ्यांवर शस्त्रक्रिया करीत. राजांनी केलेल्या नेत्रचिकित्सासंबंधीची कागदपत्रेही उपलब्ध आहेत. त्यात अनेक आकृत्या आहेत. त्यातील काही नोंदी मोडीत, तर काही इंग्रजीत आहेत. राजे स्वतः मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेत पारंगत होते. रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी ते आयुर्वेद, युनानी व इंग्रजी औषधांचा उपयोग करीत असत. गर्भवती स्त्री व तिचे आरोग्य, मुलांचे आरोग्य, बालरोग, नेत्ररोग, वातरोग, कावीळ, हगवण, दमा, सर्दी, पडसे, अ‍ॅनिमिया, क्षयरोग, कर्करोग इत्यादी रोगांची माहिती ’शरभेंद्र वैद्य मुरईगल’ या काव्यग्रंथात आढळते. धन्वंतरी महालात युरोपीय व भारतीय डॉक्टरांची नियुक्ती केली जात असे. नवीन औषधांचा उपयोग करण्यापूर्वी त्या औषधांची चाचणी केली जात असे. औषध तयार करण्याची पद्धती, त्या औषधांची यादी, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेळी होणार्‍या त्रासावर औषधे ’स्त्रियांचे दोषास्पद’ या हस्तलिखितात आहेत. ‘अस्थी विद्या’ किंवा ’अस्थी वर्णन’ हा द्वैभाषिक कोश स्वतः सरफोजी राजांच्या हस्ताक्षरात आहे. हा कोश राजाने स्वतःच्या माहितीसाठी केला असावा. मुख्य नोंद इंग्रजी भाषेत व तिचा अर्थ मोडी लिपीत दिला आहे. राजांनी पशुवैद्यकाचा अभ्यास करून पशुवैद्यक विभाग धन्वंतरी महालात सुरू केला. सरफोजी राजे अश्वपरीक्षेतही पारंगत होते. कोणता घोडा जय मिळवून देणार व कोणता नाही, अश्वाची शुभ व अशुभ चिन्हे, अश्वाची गती, उंची तसेच अश्वांच्या आयुष्याविषयीचा राजांचा अभ्यास दांडगा होता. त्यांनी ’गजशास्त्र प्रबंध’, ’गजशास्त्र सार’ या ग्रंथांचीही निर्मिती केली. राजांनी पक्षिजगताचा अभ्यासही केल्याचे आढळते. पक्षी लक्षण व चिकित्सा यासंबंधीचे ग्रंथ या ग्रंथालयात आहेत. हे सर्व ग्रंथ त्या त्या विषयातील तज्ज्ञांकडून माहिती घेऊन लिहून घेतले असावेत. या त्यांच्या वैविध्यपूर्ण कार्याबरोबरच राजे वैयक्तिक आयुष्यात अत्यंत धार्मिक व जनकल्याणकारी होते
 
 
जनकल्याण
 
राजे वैयक्तिक आयुष्यात धार्मिक व धर्मसहिष्णू होते. त्यांनी हिंदू धर्माबरोबर ख्रिश्चन धर्माचा आदर केला. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अनेक यज्ञयाग केले. काशी, गया, प्रयाग या त्रिस्थळी यात्रा केल्या. यात्रेवरून परत आल्यावर त्रिस्थळी यात्रेच्या ‘लावण्या’ हा काव्यग्रंथ रचला. तंजावर-रामेश्वरम मार्गावर तंजावरपासून 14 मैलांवर मुक्तंबापूर छत्रम उभारले. या छत्रमला लागून शाळा होती. त्यात तमिळ, तेलुगू व इंग्रजी भाषेतून शिक्षण दिले जात असे. या छत्रमना जोडून आरोग्यशाळा होती. एखादा यात्रेकरू येथे वास्तव्याला असताना आजारी पडल्यास त्याला बरे वाटेपर्यंत त्याच्यावर सरकारी औषधकोठीतून मोफत औषधोपचाराची व्यवस्था होती. यात्रेकरूंपैकी एखादी स्त्री गर्भवती असल्यास तिच्याकडे विशेष लक्ष दिले जात असे. योगायोगाने ती स्त्री तिथेच प्रसूत झाल्यास तिच्याकडे व बाळाकडे तीन महिने लक्ष पुरवले जात असे.
 
तंजावरमधील पाण्याची अडचण लक्षात घेऊन शिवगंगा तलावातून पिण्याचे पाणी जलसूत्राद्वारे घरोघरी पोहोचविले जात असे. स्वच्छतेच्या दृष्टीने भुयारी गटारांची बांधणी केली गेली होती. त्यांच्या कारकीर्दीत अनेक विहिरी व तलाव बांधले गेले. राजे वारंवार राज्यात दौरे करून रयतेची काळजी घेत असत. त्यांनी मनोरला जहाजांसाठी गोदी व बंदर बांधले. तंजावरपासून पन्नास किलोमीटर अंतरावर हवामान खात्याचे केंद्र त्यांनी उभारले; जे व्यापारासाठी अत्यंत उपयुक्त होते. याशिवाय त्यांच्या कार्यकाळात नौकानयन ग्रंथालय तसेच नौकानयन भांडार उभारून नौकानयनाचे तंत्र विकसित केले गेले.
 
तंजावरच्या कर्तृत्वशाली राजपरंपरेतील अत्यंत लोकप्रिय राजे सरफोजी यांनी आपली कारकीर्द शारदेच्या सेवेत रुजू केली. ’पेरिया कोविल’ (मोठे देऊळ) च्या प्रांगणातील भिंतीवर मराठी रियासत कोरून त्यांनी दगडांना बोलके केले! राजांच्या या सर्व कर्तृत्वातून कल्पकता व दूरदृष्टी जाणवते. या बहुआयामी नृपतीची कीर्ती हिंदुस्तानपुरती सीमित नव्हती, तर ती इंग्लंडमध्येही पोहोचली होती. इंग्लंडमधील रॉयल एशियाटिक सोसायटीने सरफोजी राजांची विद्वत्ता व संशोधन वृत्तीचे अवलोकन करून त्यांना आपल्या संस्थेचे सन्माननीय सभासदत्व बहाल केले. राजांचे विचार अतिशय उदार आणि उदात्त होते. त्यांनी अनेक अज्ञानी व धर्मभोळ्या समजुती बाजूस सारून राज्यात अनेक सामाजिक व शैक्षणिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. काळाची पावले ओळखून आधुनिकतेची कास धरली. अशा या द्रष्ट्या राजाच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण चिरकाल लोकांच्या मनात कायम न राहते तरच नवल.