राजधानीत ‘धुरक्या’चा भस्मासूर

विवेक मराठी    12-Nov-2022
Total Views |
डॉ. श्रीकांत कार्लेकर
। 9764769791
दिल्लीमध्ये हवा प्रदूषणाची ही पातळी आज इतक्या धोकादायक अवस्थेला पोहोचली आहे की दृश्यमानता कमी झाल्यामुळे होणारे रस्त्यांवरचे अपघात, विमानांची उड्डाणं रद्द होण्याच्या घटना आणि प्रदूषित हवेमुळे शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्याचे प्रसंग यांत दर वर्षी वाढच होत आहे. दिल्ली हे शहर एक मोठं ’गॅस चेंबर’ झालंय!
 
delhi pollution
 
दर वर्षी भारतातील अनेक मोठ्या शहरांसाठी हवा प्रदूषण धोकादायक पातळीच्याही वरपर्यंत वाढण्याचा काळ म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरचा कालखंड. याही वर्षी देशातील अनेक महानगरं त्याच दिशेने वाटचाल करू लागली आहेत! दिल्ली हे या आपत्तीचं प्रातिनिधिक शहर म्हणून जगभरात प्रसिद्ध पावलं आहे. महानगरांच्या हवेत साचणारा धूर आणि धुळीचे कण शाप बनून लक्षावधी लोकांसमोर आरोग्याचं मोठं संकट उभं करीत आहेत.
 
 
 
दिल्ली हे आज जगभरात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जातं. एका अंदाजानुसार दिल्ली शहरात यामुळे दर वर्षी अकरा हजारपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात. 2013-14पासून वाहनांचं वाढतं प्रमाण, औद्योगिक उत्सर्जन, बांधकामं आणि शेतजमिनीत तृण जाळण्याच्या घटना (Stubble burning) यामुळे प्रदूषणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दिल्लीत 2.5 मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराच्या तरंगत्या घन पदार्थांचं (सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटरचं) वार्षिक प्रमाण 1 घनमीटर हवेत 153 मायक्रोग्रॅम इतकं प्रचंड असतं. हे प्रमाण 60 मायक्रोग्रॅम एवढंच अपेक्षित आहे. 10 मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराच्या तरंगत्या घन पदार्थांचं वार्षिक प्रमाण 1 घनमीटर हवेत 292 मायक्रोग्रॅम इतकं असतं. यामुळे शहरात नागरिकांच्या श्वसनाच्या तक्रारीत मोठी वाढ तर झाली आहेच, शिवाय तापमानात चढ-उतार होत राहणं, दृश्यमानता (Visibility) कमी होणं, हवाई वाहतूक बंद पडणं ह्या घटनांतही वाढ होतेच आहे.
 
 
delhi pollution
 
दिल्लीमध्ये हवा प्रदूषणाची ही पातळी आज इतक्या धोकादायक अवस्थेला पोहोचली आहे की दृश्यमानता कमी झाल्यामुळे होणारे रस्त्यांवरचे अपघात, विमानांची उड्डाणं रद्द होण्याच्या घटना आणि प्रदूषित हवेमुळे शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्याचे प्रसंग यांत दर वर्षी वाढच होत आहे. दिल्ली हे शहर एक मोठं ’गॅस चेंबर’ झालंय! वर्ष 2018मध्ये पूर्व दिल्लीत 30 ऑक्टोबरला 10 मायक्रोमीटर आकाराच्या कणांची पातळी दर घनमीटरला 1519 मायक्रोग्रॅम इतकी, म्हणजे प्रदूषण नियंत्रण खात्याने निश्चित केलेल्या पातळीपेक्षा 15 पट जास्त होती! त्या रात्रीपर्यंत ही पातळी 1016 मायक्रोग्रॅम इतकी होती. वर्ष 2016मध्ये दिल्लीतील 20 टक्के वाहनं 2.5 मायक्रोमीटर आकाराच्या प्रदूषकांची पातळी वाढायला जबाबदार असल्याचं दिसून आलं होतं. वर्ष 2018मध्ये त्यात 40 टक्क्यांनी वाढ झाली होती. 2019, 2020 आणि 2021मध्ये ही प्रदूषण पातळी अनुक्रमे 130, 84 आणि 96.4 असली, तरी ती धोकादायकच होती. या वर्षी 7 नोव्हेंबर 2022 या दिवशी हे प्रमाण 253 मायक्रोग्रॅम - म्हणजे प्रदूषण नियंत्रण खात्याने निश्चित केलेल्या पातळीपेक्षा 40.6 पट जास्त होती!
 
 
 
भरपूर झाडांची लागवड, सीएनजीवर धावणारी वाहनं, पर्यावरणहितैषी दिल्ली मेट्रोची सुरुवात असे प्रयत्न होऊनही शहरातील मोटारगाड्यांची वाढती संख्या, वाढती बांधकामं आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागाकडून शहराकडे वाहत येणार्‍या धुराचं वाढतं प्रमाण यामुळे हे संकट कमी होण्याची लक्षणं आजही दृष्टिपथात नाहीत.
 
 
delhi pollution
 
हे चित्र आता केवळ भारतापुरतंच मर्यादित राहिलं नसून जगातील अनेक शहरं या विषारी हवा प्रदूषणाचा सामना करीत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHOच्या) अहवालानुसार शुद्ध हवेचे सगळे मापदंड ओलांडून बर्‍याच शहरांतील 80 टक्क्यांपेक्षा जास्त जनसंख्या यामुळे श्वसनविकारांनी बाधित होत चालली आहे. दिल्लीप्रमाणेच ब्रिटिश कोलंबिया (कॅनडा), शांघाय, बीजिंग (चीन), लंडन (यू.के.), ग्लासगो, एडिनबर्ग (स्कॉटलंड), मेक्सिको सिटी, सँटियागो (चिली), तेहरान (इराण), लॉस एंजेलीस (कॅलिफोर्निया), उलन बाटर (मंगोलिया), कालीमंतान (आग्नेय आशिया) अशी अनेक जागतिक शहरं आज ह्या विळख्यात सापडली आहेत.
 
 
 
भारतातही पाटणा, ग्वाल्हेर, रायपूर, अहमदाबाद, कानपूर, आग्रा अशी अनेक शहरंही ह्या समस्येने बाधित आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर येथेही परिस्थिती फारशी वेगळी नाही. भारतातील कानपूर शहर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या शहरातील 2.5 मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराच्या तरंगत्या घन पदार्थांचं वार्षिक प्रमाण 1 घनमीटर हवेत 319 मायक्रोग्रॅम इतकं आहे. 10 मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराच्या तरंगत्या घन पदार्थांचं हे 1 घनमीटर हवेतील प्रमाण मुंबईत 104, तर जगातील इतर देशांपैकी कैरो इथे 284, ढाका इथे 147 आणि बीजिंग इथे केवळ 92 मायक्रोग्रॅम इतकं आहे. दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाचा निर्देशांक मागच्या वर्षी शनिवारी 2 डिसेंबर रोजी 331 होता, तो रविवारी एकदम 390 झाला होता. तरंगणार्‍या सूक्ष्म प्रदूषकांची पातळी अतिउच्च होती.
 
 


delhi pollution
 
हवेच्या ह्या प्रदूषणाचा इतिहास पाहता असं लक्षात येतं की माणसाने जेव्हा आगीचा शोध लावला आणि लाकूडफाटा जाळण्यासाठी आगीचा उपयोग सुरू केला, तेव्हाच हवेच्या मानवनिर्मित प्रदूषणाला सुरुवात झाली. त्यानंतर अशा जळण्यातून तयार झालेला धूर हळूहळू दाट लोकसंख्येच्या नागरी वस्त्यांवर तरंगताना दिसू लागला. औद्योगिक क्रांतीनंतर तर कोळसाही जाळला जाऊ लागल्यावर प्रदूषणाचं हे संकट आणखीनच गडद होत गेलं.
 
 
 
इ.स. 1850च्या दरम्यान लंडन शहरावर कोळशाचा धूर आणि धुकं (Pea Soup) यांच्या प्रचंड मोठ्या काळ्या दाट थराने शहर काळवंडून जाऊ लागलं. याने अनेकांचे बळीही घेतले. यावरूनच 1911च्या सुमारास या प्रदूषण प्रकाराला ‘स्मॉग’ (smog) म्हणजेच ‘धुरकं’, ‘धूरधुकं’ असं नाव दिलं गेलं. धुरकं हे एक प्रकारचं दृश्य स्वरूपातलं प्रदूषण असून ते नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर ऑक्साइड, ओझोन, कार्बन मोनॉक्साइड आणि धूर ह्यांचं मिश्रण असतं. आजकाल वाहनांतून बाहेर पडणार्‍या धुरामुळे ह्या प्रदूषणात मोठीच भर पडत आहे. औद्योगिक शहरातील हवेत कारखान्यातील धुरामुळे जलशोषक अणूंचं प्रमाण जास्त असतं. यामुळे सांद्रीभवन होऊन मोठ्या प्रमाणात काळपट धूरधुक्याची निर्मिती होते. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतरही बाहेर पडणार्‍या सल्फर डायऑक्साइड व इतर सूक्ष्म कणांमुळे असं धुरकं तयार होतं. याला व्हॉग (vog) असं म्हटलं जातं.
 
 
 
हे प्रदूषण कमी करण्याच्या अथक प्रयत्नांनंतर लंडन शहर कोळशाचा धूर आणि धुकं यापासून मुक्त झालं. पण आधुनिक काळात वाहनातून होणार्‍या धुराच्या उत्सर्जनामुळे प्रदूषणाचं प्रमाण पुन्हा वाढू लागलं आहे. अमेरिकेतील पिट्सबर्ग, पेनसिल्वानिया, सेंट लुई, मिसूरी अशा अनेक शहरांत आज दिवसाही वाहनं हेडलाइट लावून चालवावी लागताहेत. 1948मध्ये पेनसिल्वानियातील डोनोरा शहरात आजूबाजूच्या डोंगरांनी बंदिस्त केलेल्या दरीत 5 दिवस साठून राहिलेल्या धुक्यात शहरातील स्टीलचे आणि झिंक वितळवणारे कारखाने आणि सल्फ्युरिक अ‍ॅसिडचे प्लांट यांनी हवेत सोडलेली प्रदूषकं मिसळली गेली व हजारो माणसं बाधित झाली. त्यानंतर आलेल्या ‘क्लीन एअर अ‍ॅक्ट’च्या सक्तीमुळे हे प्रमाण सगळीकडेच एकदम कमी झालं.
 
 
 
हवेच्या या प्रदूषणाची पातळी प्रामुख्याने कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड, सल्फर ट्रायऑक्साइड, नायट्रिक व नायट्रोजन ऑक्साइड, मिथेन, क्लोरोफ्लुरोकार्बन आणि हवेत तरंगणारे सूक्ष्म घन पदार्थ व द्रवरूपी थेंब यामुळे वाढत असतं.
 
 
delhi pollution
 
मोठमोठ्या शहरांवर आजकाल ‘प्रकाशरासायनिक धुरकं’ (Photo chemical smog/fog) व ‘औद्योगिक धुरकं’ ( Industrial smog) अशा दोन मुख्य प्रकारच्या धुरक्याचे प्रचंड थर आढळून येत आहेत. वर सांगितलेल्या सर्व प्रकारच्या प्रदूषकांत सूर्यप्रकाशामुळे होणार्‍या परस्पर क्रिया ज्या धूरधुक्याच्या निर्मितीस कारण होतात, त्यास प्रकाशरासायनिक धुरकं म्हटलं जातं. वाहनातून बाहेर पडणार्‍या धुरामुळे पिवळसर तपकिरी रंगाचा नायट्रोजन ऑक्साइड तयार होतो. मोठ्या शहरात सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशानंतर दुपारपासूनच ह्या पिवळसर तपकिरी धूरधुक्याचा थर दिसू लागतो. यामुळे डोळ्यांची आग होऊन ते चुरचुरू लागतात. भरपूर ऊन अनुभवणार्‍या उबदार व कोरड्या हवेच्या नागरी वस्त्यांवर प्रकाशरासायनिक धूरधुक्याचा प्रभाव जास्त असतो.
 
 
 
2.5 मायक्रोमीटरपेक्षा लहान आकाराचे, आगीतून आणि डिझेल ज्वलनातून हवेत पसरणारे कण वातावरणात बराच काळ तरंगत राहतात आणि माणसांच्या फुप्फुसांत सहज प्रवेश करतात. थंडीच्या दिवसात दिल्लीसारख्या औद्योगिक शहरातील लोकांना सल्फर डायऑक्साइडमुळे तयार झालेल्या सल्फ्युरिक अ‍ॅसिडच्या तरंगत्या कणांमुळे व उडणारी राख, परागकण, सिमेंटची धूळ, गिरणीतील पीठ पदार्थ, कोळशाची राख व रंगद्रव्यं अशा सूक्ष्म तरंगत्या पदार्थांमुळे (Aerosolsमुळे) तयार झालेल्या धुरक्याचा सामना करावा लागतो. चीन, भारत, युक्रेन व काही पूर्व युरोपीय देशात जिथे प्रदूषण नियंत्रणाचा फारसा प्रयत्न केला जात नाही, तिथे मोठ्या प्रमाणावर कोळसा ज्वलनामुळे अशा प्रकारच्या धूरधुक्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं.
 
 
 
कोळसा, लाकडं यांच्या ज्वलनातून आणि धुळीची वादळं, जंगलातील आगी याचबरोबर भारतातील डोंगराळ भागांतील सखल दर्‍याखोर्‍यांत अशी प्रदूषित हवा मोठ्या प्रमाणावर साठवली जाते. शेताची भाजावळ (Crop burning), बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणारी प्रचंड धूळ यांचाही यात हातभार असतोच.
 
 
 
शहरांबरोबर प्रदूषणाचं हे लोण आता शहरांच्या जवळ असलेल्या खेड्यांच्या दिशेने सरकलं आहे. वर्ष 2015मध्येच खेड्यातील 75 टक्के मृत्यू हे याच कारणांमुळे झाल्याची आकडेवारी उपलब्ध आहे.शेणाच्या गोवर्‍या, लाकूड जाळण्यातून उत्पन्न होणारे प्रदूषित वायू याला कारणीभूत होते, असं ही माहिती सांगते. शेतात केलेल्या भाजावळीमुळे मुंबई, चेन्नई यासारख्या महानगरांच्या दिशेने जो धूर पसरतो, त्यातून ही प्रदूषकं शहरातील बांधकामांची धूळ, वाहनातून बाहेर पडणारा धूर, फॅक्टरीतून आणि इतर उद्योगांतून सोडला जाणारा धूर यात मिसळून जातो. चुलींच्या वापरातून भारतात 25 टक्के हवा प्रदूषण होतं. शहरांजवळच्या वीट भट्ट्याही याला हातभार लावतातच.
 
 
 
एका सर्वेक्षणानुसार, भारतातील विषारी वायू प्रदूषणाची ही समस्या कदाचित फार जुनी आहे. आजकाल प्रत्येक शहराभोवती आणि आजूबाजूच्या भागांत हे वायुप्रदूषण मोजण्याचं प्रमाण वाढल्यामुळे ते लक्षात येऊ लागलं आहे. प्रदूषण मोजण्याचं हे प्रमाण सगळीकडे जसं वाढेल, तसं भारतातील आणखी अनेक ठिकाणांनी ही पातळी यापूर्वीच गाठली असल्याचंही लक्षात येण्याची शक्यता आहे.
 
 
 
शहराचा भूगोल, भूरूपिकी (Geomorphology), हवामान, लोकसंख्येची घनता, औद्योगिक संकुलांची संख्या, छोट्या मोटारी व ट्रक यांची संख्या आणि इंधनांचा वापर अशा सगळ्याच गोष्टींवर हवा प्रदूषणाचं प्रमाण ठरतं.
 
 
 
जिथे पर्जन्यवृष्टी किंवा हिमवृष्टी जास्त असते, अशी शहरं मात्र नैसर्गिकदृष्ट्या या प्रदूषणापासून मुक्त असतात. समुद्रकिनारी असलेली शहरंही ह्या बाबतीत थोडी जास्त नशीबवान असतात. कारण जमिनीकडून समुद्राकडे वाहणार्‍या हवेतील तरंगती प्रदूषकं समुद्राकडून येणार्‍या खारट समुद्री हवेच्या फवार्‍यामुळे नष्ट केली जातात. किनार्‍यांवर उंच इमारती असल्या, तर मात्र हा परिणाम थोडा कमी दिसतो. जिथे वारे जास्त वेगाने वाहतात, तिथेही हवेतील प्रदूषकं इतरत्र वाहून नेली जातात. मात्र ज्या दिशेने ती वाहत जातात, त्या बाजूकडील ठिकाणं प्रदूषणग्रस्त होतात.
 
 
मोठ्या शहरातील उंच इमारतींमुळे वार्‍याचा वेग रोखला जातो आणि हवेतील प्रदूषकं तिथेच घुटमळत राहतात. डोंगराळ प्रदेशातील नागरी वस्त्यांतही सखल भागात प्रदूषकं साचून राहतात. ती इतरत्र पसरू शकत नाहीत. तापमानाच्या विपरीततेमुळे (Temperture inversionमुळे) धुकं व त्याबरोबर प्रदूषकही दरीत साचतात आणि प्रदूषण पातळीत वाढ होते.
 
 
 
अनेक पर्यावरणवाद्यांच्या मते नागरीकरण (urbanization) ही खरं म्हणजे समस्या नसून नागरी वस्त्यांची सर्व दिशांनी होणारी वाढ (Urban sprawl) ही समस्या आहे! ह्यामुळे आजूबाजूच्या मोठ्या ग्रामीण, प्रदूषणविरहित, स्वच्छ परिसराचा र्‍हास होण्याची शक्यता वाढत असते. दिल्लीत बांधकाम व्यवसायातील स्टोन क्रशर, हॉट मिक्स प्लांट यावर निर्बंध, कोळसा आणि जैवराशी (Biomass) वापरणार्‍या उद्योगांवर नियंत्रण, वीट भट्ट्यांवर बंधन, खाजगी वाहनांच्या-विशेषत: डिझेलवर चालणार्‍या वाहनांच्या वापरावर नियंत्रण, कचरा जाळण्यावर बंदी आणि नोव्हेंबर महिन्यांत औद्योगिक उलाढाली पूर्णपणे बंद ठेवण्याचे प्रयत्न अशा अनेक सूचना प्रदूषणाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देण्यात आल्या आहेत. उत्तर भारतात नोव्हेंबरमध्ये पश्चिमी अडथळ्यांमुळे (Western disturbanceमुळे) पाकिस्तान आणि थरच्या वाळवंटाकडून वाहणार्‍या वार्‍यामुळे आणि प्रत्यावर्त (Anticyclone) निर्मितीमुळे ह्या समस्येची तीव्रता आणखीनच वाढते. पंजाब व हरयाणा या शेतीप्रधान राज्यांतून शेतजमिनीत तृण जाळण्याच्या घटनांमुळे तयार होणार्‍या धुरात ही वाहत येणारी धूळ मिसळून गेल्यामुळे तीव्रता आणखी वाढते. वार्‍याचा वेग कमी झाल्यावर ही प्रदूषकं हवेत साचून राहतात व कालांतराने खाली बसतात. दिल्ली आणि उत्तर भारतातील प्रदूषणाबाबतीत ही नैसर्गिक कारणंही तितकीच महत्त्वाची असतात.
 
 
 
दिल्लीसारखी शहरं अधिक शुद्ध, स्वच्छ हवेची, प्रदूषणमुक्त व जगण्यासाठी योग्य बनवणं हे खरं तर ह्या समस्येचं योग्य उत्तर आहे. ह्यासाठी शहरांचं पर्यावरणहितैषी अशा ग्रीन सिटीमध्ये किंवा इको सिटीमध्ये रूपांतर करणंही आता गरजेचं आहे. अशा शहरात प्रदूषणावर पूर्ण नियंत्रण, कचरानिर्मितीत घट आणि सौर शक्ती वापरून त्याचा पुनर्वापर यावर मुख्य भर असावा. शहरातील व आजूबाजूच्या प्रदेशातील जीवविविधतेचं रक्षण करणं व त्यात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणं या गोष्टींनाही इथे प्राधान्य हवं. ही शहरं लोकाभिमुख हवी, ती वाहनाभिमुख (Car oriented) नसावी.
 
 
 
मुंबई, कोलकाता, चेन्नई ह्यासारख्या शहरांतील खाड्या, नद्या वारंवार स्वच्छ करून, त्यांच्या पर्यावरणाची सुधारणा किंवा पुनर्निर्मिती, तसंच दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू अशा शहरांच्या नदी पर्यावरणात सुधारणा, वृक्षांची भरपूर लागवड, टेकड्यांच्या पर्यावरणाची सुरक्षितता आणि शहराच्या सर्व दिशांनी वाढणार्‍या सीमेवर नियंत्रण असे अनेक उपाय प्रदूषण नियंत्रणाच्या संदर्भात अभ्यासकांनी मांडले आहेत. इको सिटी (Eco city)सारखे यशस्वी प्रयोग ह्याआधीही अनेक ठिकाणी झालेत. ब्राझिलमधील क्युरिटिबा, न्यूझीलंडमधील वैताकेरी, फिनलंडमधील टॅपिओला, ओरेगॉनमधील पोर्टलँड आणि कॅलिफोर्नियातील डेव्हिस अशी अनेक उदाहरणं देता येतील. यातील अनेक इको सिटीजमध्ये प्रदूषण नष्ट करण्यात उत्तम सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा खूप मोठ्ठा हातभार आहे. स्वच्छ, स्वस्त, सोयीस्कर, सक्षम व पुरेशी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा शहराला हवेच्या प्रदूषणापासून किती चांगल्या प्रकारे मुक्त करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ब्राझिल ह्या विकसनशील देशातील क्युरिटिबा हे शहर!
दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई, पुणे, बंगळुरू अशा सर्वच शहरांतील वाढत्या प्रदूषण समस्येवर अशा तर्‍हेचाच उपाय करणं योग्य ठरेल. शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी जगात इतरत्र झालेले प्रयोग आपल्याकडे जसेच्या तसे लागू करता येतील असं मुळीच नाही. आपल्या शहरांचा भूगोल, इतिहास, वाढ आणि विकास व पर्यावरण हे सगळं इतकं वेगळं आहे, त्या प्रत्येकाचा विचार करूनच आपल्याला अल्पकालीन व दीर्घकालीन उपाय शोधावे लागतील. परदेशातून आणून आपल्याकडे चालू केलेल्या अनेक वाहतूक योजनांचा आपल्या शहरांतून कसा बोजवारा उडाला आहे, ते आपण पाहतोच आहोत!
 
 
 
आपल्याकडची बरीचशी शहरं मुळातच कुठलंही नगर नियोजन नसताना वाढली. वेड्यावाकड्या पद्धतीने आणि जागा मिळेल तशी आणि तिथे वाढलेल्या शहरांतून मार्ग कडून उपाय शोधण्याची गरज आहे आणि ते शोधायला निश्चितच अजूनही अनेक संधी आहेत. वर्षागणिक वाढणारी वाहन संख्या आणि पर्यावरणाचा र्‍हास करणारी अनिर्बंध बांधकामं यावर नियंत्रण ठेवलं, तरी दिल्ली आणि अर्थातच पुणे, मुंबई यासारख्या शहरातील समस्या कमी करता येईल. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता ही शहरं किनारी असून त्यांचे हवा प्रदूषणाचे प्रश्न सागरी हवामानाशी निगडित आहेत, तर दिल्ली, पुणे ही शहरं समुद्रापासून दूर असल्यामुळे तिथल्या समस्या वेगळ्या आहेत. असं असलं, तरी प्रदूषणाच्या ह्या समस्येच्या मुळाशी जागा मिळेल तशी वाढत राहण्याची शहरांची वृत्ती आणि खाजगी वाहनांचा अमर्याद वापर यामुळे भारतातील सगळीच शहरं या भस्मासुराच्या कचाट्यात सापडल्याचं दिसून येत आहे, हे नक्की!